पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेला पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील वर्षीच्या पावसाळ्यात शंभर टक्के भरले होते. तरी देखिल अद्यापही शहरातील बहुतांशी भागात विशेषता झोपडपट्टी भागात व चाळ परिसरात कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा होत आहे. पुढील पंधरा दिवसात संपुर्ण शहरात पूर्ण दाबाने व नियमित पाणी पुरवठा मनपाने करावा अन्यथा महानगरपालिका भवनाला हजारो महिलांसह घेराव घालू असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांनी दिला.
गुरुवारी शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी मनपा भवनावर धडक हंडा मोर्चा काढला. तत्पुर्वी महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चा मोरवाडी चौकात आला. तेथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मनपा भवनाच्या प्रवेशव्दारासमोर पोलिसांनी मोर्चा अडवला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चामध्ये माजी नगरसेविका निर्मला कदम तसेच छाया देसले, निर्मला खैरे, वैशाली शिंदे, तुलसी नांगरे, स्वाती शिंदे, भारती घाग, डॉ. सुनिता पुलावळे, रमा भोसले, सुप्रिया मलशेट्टी, रझीया शेख, आशा भोसले, अनिता डोळस, रेखा ओव्हाळ, शिल्पा गायकवाड, दिशा बनसोडे, कल्पना बनसोडे, नंदा तुळसे, अनिता धर्माधिकारी आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
या मोर्चास संबोधित करताना कदम म्हणाले की, मी विरोधी पक्षनेता असताना प्रशासनाकडे मागणी केली होती की, महानगरपालिका एमआयडीसी कडून व्यावसायिक दराने पाणी घेते यात नागरिकांचे नुकसान आहे. चोविसतास पाणी पुरवठ्याचे गाजर मागिल पाच वर्षांपूर्वी भाजपने दाखविले. जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असतानाही शहरातील बहुतांशी भागात, झोपडपट्ट्यांमध्ये रात्री, अपरात्री दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्यात जाणूनबुजून भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि प्रशासन राजकारण करीत आहेत.अशीही टिका कदम यांनी यावेळी केली.
सभेनंतर महिला शहराध्यक्षा सायली नढे, माजी नगरसेविका निर्मला कदम यांच्या समवेत शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले.
शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचा हंडा मोर्चा
Reviewed by ANN news network
on
February 25, 2022
Rating:

No comments: